जामखेड: जामखेड तालुक्यातील तरडगाव येथे आईसह तिच्या दीड वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तरडगाव, वंजारवाडीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये साळु शिवाजी चौरे (वय २३) व तिचा दीड वर्षीय मुलगा विवांश शिवाजी चौरे यांचा समावेश आहे. तरडगाव येथील दत्तुबा ढाळे यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आले. ग्रामस्थांना विहिरीत काहीतरी तरंगताना दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नागरिकांनी तातडीने धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
दोघांना त्वरित ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. आईच्या कुशीत वाढणाऱ्या चिमुकल्याचाही अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत वंजारवाडी येथील बिभिषण तांदळे (वय ५९) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पुतणी साळु चौरे व नातू विवांश हे १० मेपासून बेपत्ता होते. नातेवाईकांकडून त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता. मात्र आज सकाळी तरडगाव येथील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार दोघांचा मृत्यू पहाटे १ ते ३ वाजेदरम्यान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सहाय्यक फौजदार सय्यद नेम यांनी पंचनामा करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद (क्रमांक १२/२०२६) केली आहे. पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.










